७ एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस आहे. जगात उद्भवणा-या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक समस्याविषयी जागतिक पातळीवर जनजागरण करण्यासाठी दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेकडील आकडेवारी नुसार २०१० सालापर्यंत जगातील विविध रोगांच्या प्रादुभार्वापैकी ७० टक्के रोग हे असांसर्गिक असतील.
सध्या यांत्रिकी उपकरणामुळे शारिरीक कष्ट कमी होत चालले आहेत. कपडे धुणे, भांडी घासणे, पिठ मळणे, दळणे, कुटणे ही कामे यंत्रच करीत आहेत. त्यामुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणाची समस्या उद्भवत आहे. त्यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळत आहे. विज्ञानाने भौतिक सुख माणसाला दिले आहे. पण त्यामुळे काही अंशी शारिरीक आणि मानसिक स्वास्थ हरविले आहे. प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. शासन त्यावर उपाय योजित असते. मोठय़ा प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे कार्बन वायू शोषून घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंगसारखी समस्या निर्माण झाली आहे. शासन पातळीवर अनेक निर्णय घेऊन नवीन योजना आणल्या जात आहेत.
महाराष्ट्र शासन सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी नेहमीच जागरुक असते. शारिरीक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ अशी आरोग्याची नवीन व्याख्या करावी लागेल. आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्त असणे असे नव्हे. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक असणे प्रत्येकालाच आवश्यक आहे. यासाठी आरोग्य जागृती महत्त्वाची आहे.
सध्याचे जीवन हे धकाधकीचे झालेले आहे. यात जो वेळेचे गणित योग्यरितीने सोडवतो तोच पुढे जातो. पण यात हल्ली मानव आपल्या आरोग्याकडे काहीसा दुर्लक्ष करू लागला आहे. ‘सिर सलामत तो पगडी पचास’, असे म्हटले जाते. त्यामुळेच की काय आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन या दिनानिमित्ताने ‘विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई’ यांच्याकडून प्राप्त झालेला लेख वाचकांसाठी देत आहोत.